राहुरीत बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी जयंती उत्साहात साजरी
बाळासाहेबांच्या विचारांचा जागर; शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेला बळ..
राहुरी / सार्वमंथन प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त राहुरी तालुक्यात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांचा जागर करत शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेला अधिक बळ देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी त्यांच्या विचारांना अभिवादन करत मराठी अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
शिवसेना संघटक पै. रावसाहेब खेवरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी माणसाचा स्वाभिमान, अन्यायाविरोधातील निर्भीड भूमिका आणि ठाम हिंदुत्वाचा विचार हीच बाळासाहेब ठाकरे यांची खरी ओळख आहे. त्यांनी आयुष्यभर तत्त्वांशी तडजोड न करता संघर्षाचा मार्ग स्वीकारला.
तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेसाठी तत्त्वांचा बळी दिला नाही. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून मराठी माणसाच्या हक्कांसाठी उभी राहिलेली चळवळ आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेबांचे विचार अधिकच मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी डॉ. संजय म्हसे, कैलास शेळके, भरत धोत्रे, विलास ढोकणे, पोपट शिरसाठ, पोपटराव शेळके, दत्तात्रय शिंदे, ओंकार खेवरे, सतीश माने, शहाजी वराळे, अमित भागवत, सुरज पोटे, अमोल पवार यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.“जय भवानी, जय शिवाजी” आणि “जय महाराष्ट्र”**च्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.




