मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणाआधी बिघाड; !
अजित पवारांच्या विमान अपघाताची आठवण ताजी..
मुंबई / सार्वमंथन वृत्तसंस्था
राज्यातील व्हीआयपी सुरक्षेच्या यंत्रणेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा अपघात थोडक्यात टळला. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे रवाना होण्याच्या तयारीत असतानाच ही धक्कादायक घटना समोर आली.
मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करणार होत्या. मात्र, टेकऑफपूर्वीच वैमानिकाच्या सतर्कतेमुळे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून उड्डाण तात्काळ रद्द करण्यात आले आणि संभाव्य अनर्थ टळला.
विशेष म्हणजे, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली होती, ही घटना अद्याप जनतेच्या स्मरणात ताजी असतानाच आता एका कॅबिनेट मंत्र्याच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड होणे, राज्यातील व्हीआयपी हवाई सुरक्षेतील ढिसाळपणाकडे बोट दाखवणारे मानले जात आहे.
पंकजा मुंडे सध्या मराठवाड्यात झंझावाती प्रचार दौऱ्यावर असून त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूरमध्येही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. बिघाडाची माहिती समजताच काही काळ कार्यकर्त्यांमध्ये चिंता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पंकजा मुंडे या सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
राजकीय रणधुमाळीत वेळ महत्त्वाची असल्याने पंकजा मुंडेंनी दौरा रद्द न करता पर्यायी हेलिकॉप्टरची तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मुंबईहून दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले असून, त्याद्वारे त्या लातूरकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या सर्व नियोजित सभा नियमानुसार पार पडणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतरही हवाई सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये अपेक्षित सुधारणा झाल्या का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका मागोमाग एक घडणाऱ्या घटनांमुळे व्हीआयपींच्या जीवित सुरक्षेबाबत सरकार किती गंभीर आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी व्हीआयपी हवाई सुरक्षेची यंत्रणा तातडीने तपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




