स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – सौ शालिनीताई विखे पाटील
‘शैक्षणिक विषयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचे एकत्रीकरण’ या राष्ट्रीय चर्चासत्राचे कोल्हार येथे उद्घाटन.
कोल्हार / सार्वमंथन
आजच्या बदलणाऱ्या काळानुसार शिक्षण पद्धतीत मोठे बदल होत असून विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानाच्या भक्कम पायावर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगतीचा मार्ग निवडला पाहिजे. पारंपरिक ज्ञान विद्यार्थ्यांना संस्कार, मूल्ये आणि विचारांची दिशा देते, तर आधुनिक तंत्रज्ञान त्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
कोल्हार येथील ‘लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत ‘शैक्षणिक विषयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचे एकत्रीकरण’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ६) शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे पाटील होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितले की, आज कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षण साधनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा सर्जनशील आणि सकारात्मक उपयोग करून ज्ञानप्राप्ती करावे. संशोधन, नवकल्पना आणि सर्जनशीलतेला प्राधान्य देत समाजाच्या विकासात योगदान देणे ही आजच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भास्करराव खर्डे पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग ही भविष्यातील वेगाने वाढणारी करिअर क्षेत्रे असल्याचे सांगत, या चर्चासत्रातून संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक धोरणांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठ गीताने झाली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सेमिनार प्रोसिडिंगचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी केले, तर चर्चासत्राचे समन्वयक प्रा. परमेश्वर विखे यांनी चर्चासत्र आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी डॉ. बॉबी फिलिप्स यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. आभार प्रदर्शन डॉ. प्रतिभा कानवडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संगीता धिमते व प्रा. प्रणीता जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संभाजी देवकर, अशोकशेठ असावा, भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, साहेबराव दळे, पत्रकार गणेश सोमवंशी, ऋषिकेश खांदे, भरत (आबा) खर्डे, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.
दरम्यान, दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्रासह राज्याबाहेरील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील सुमारे सत्तर संशोधक प्राध्यापक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. तज्ज्ञ प्राध्यापक, संशोधक व शिक्षकांना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून विद्यार्थ्यांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर व समन्वयक प्रा. परमेश्वर विखे यांनी केले.




