राहुरीतील व्यापाऱ्याचा विश्वासघात,सोयाबीनचा ३० लाखांचा ट्रक मुद्देमाल जप्त..
ड्रायव्हरचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, राजगुरुनगरमधून ट्रक ताब्यात..
राहुरी / सार्वमंथन प्रतिनिधी
सोयाबीन बियाण्यांनी भरलेला ट्रक अपहाराच्या उद्देशाने पळवून नेणाऱ्या चालकाचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला असून, तब्बल ३०,३९,६४८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर येथील दत्तनगर गजानन रोडवेज ट्रान्सपोर्ट येथून फिर्यादीचे भाऊ सुनील भट्टड यांच्या मालकीची आयशर कंपनीची (क्र. एमएच १२ व्हीएफ ६९११) गाडी चालक जयसिंग मुक्ताजी भगत (रा. खानापूर, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र, विश्वासाचा गैरफायदा घेत चालकाने सदर ट्रक योग्य ठिकाणी न नेता अपहार करण्याच्या उद्देशाने दुसरीकडे वळविला.
या प्रकरणी फिर्यादी प्रदीप शिवनारायण भट्टड (रा. स्वस्तिक चौक, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र. नं. ५२१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीजराजा आतार, विशाल तनपुरे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून हा ट्रक राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील मार्केटयार्डमध्ये उभा असल्याचे समजताच पथकाने तात्काळ कारवाई करत ट्रक ताब्यात घेतला.
या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक आणि १५,३९,६४८ रुपये किमतीचे महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे असा एकूण ३०,३९,६४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील मुद्देमाल पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.






