RPIचा लढवय्या आवाज हरपला; राजाभाऊ कापसे यांचे आकस्मिक निधन
आठवले यांचे खंदे समर्थक काळाच्या पडद्याआड; श्रीरामपूरच्या राजकारणावर शोककळा
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे खंदे समर्थक, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू सहकारी आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील लढवय्या नेते राजाभाऊ कापसे (वय ५५) यांचे मंगळवारी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने श्रीरामपूरसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
कामानिमित्त राजाभाऊ कापसे हे मुलगा विकी कापसे याच्यासह पुणे येथे गेले होते. तेथे अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मुलाने तातडीने दवाखान्यात जाण्याचा आग्रह केला; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा पार्थिव देह बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत त्यांच्या वाकडी येथील मूळ गावी आणण्यात येणार असून, दुपारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजाभाऊ कापसे हे मनमिळाऊ, स्पष्टवक्ते आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणून परिचित होते. श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी २० हजारांहून अधिक मते मिळवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. त्यानंतरही त्यांनी रिपाई आठवले गटाच्या विस्तारासाठी श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्ह्यात सातत्याने काम केले.
रिपाईच्या राजकीय वाटचालीत कापसे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि पक्षाशी असलेली निष्ठा यामुळे ते पक्षाच्या स्थानिक राजकारणातील महत्त्वाचे नाव बनले होते. त्यांच्या अचानक जाण्याने रिपाई आठवले गटाचा एक लढवय्या आणि निष्ठावंत आवाज हरपल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
राजाभाऊ कापसे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर, मित्रपरिवारावर आणि समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाने श्रीरामपूरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.






