अकोले : दि.21मे
अकोले तालुक्यातील राजूर गावात मागील महिन्यात कावीळ रोगाची साथ पसरली होती. दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावात आजाराचा फैलाव झाल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या निषेधार्थ गावातीलच संतोष मुर्तडक या ग्रामस्थाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. राजूर येथे ग्रामपंचायतच्या नळाद्वारे आलेले अशुद्ध पाणी पिल्याने जवळपास तीनशेहून अधिक ग्रामस्थ कावीळ आजाराने त्रस्त होते. त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर आहेत. इतके होऊन देखील ग्रामपंचायतीकडून दखल म्हणून उपाययोजना करण्यात आल्या नाही. परिणामी गावातील त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायत कारभाराचा निषेध करत आंदोलन छेडले.
गावातील गरीब रुग्णांना मदत व्हावी, ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा, ग्रामसेवकांना बडतर्फ करावे, आजार पसरवण्यास ग्रामपंचायत कारणीभूत असल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; अशी मागणी संतोष मुर्तडक यांनी केली होती. दरम्यान आज संतोष मुर्तडक आणि इतर काही जण ग्रामपंचायत कार्यालयात गेले आणि तेथे मुर्तडक यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामपंचात कार्यालयात गोंधळ उडाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर पोलिसांनी संतोष मुर्तडक आणि इतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकारामुळे ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेल्या भोंगळ कारभाराबाबत राजूर गावातील नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे.